Home Maharashtra फडणवीसांची घणाघाती टीका । एकेकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं पण उद्धव...

फडणवीसांची घणाघाती टीका । एकेकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं पण उद्धव ठाकरेंनी गरळ ओकली

580

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 1 तासाच्या भाषणाची फडणवीसांकडून 17 मिनिटांत चिरफाड

नागपूर ब्युरो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात महाराष्ट्राला साद घालत जोरदार भाषण ठोकलं. उद्धव ठाकरेंच्या जवळपास 1 तास चाललेल्या भाषणात त्यांनी भाजपवर आसूड ओढले. महाविकास आघाडी सरकार, कोरोना, भाजप, ईडी सीबीआय अशा अनेक विषयांवरुन त्यांनी शआह्दिक फटकारे लगावले. अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचं जोरदार कौतुक देखील केलं. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी 9 वाजताच पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंनी केलेल्या टीकेची सव्याज परतफेड केली. एकेकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं पण कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी गरळ ओकली, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली.

उद्धव ठाकरेंनी गरळ ओकली

एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विचारांचं सोनं लुटले जायचं, पण काल मुख्यमंत्र्यांना गरळ ओकताना बघितलं, अशी घणाघाती टीकेने फडणवीसांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली. भाजपला जनतेने नाकारलं नाही. आम्ही जेवढ्या जागा लढलो त्यापैकी 70 टक्के जागा जिंकलो. आम्हाला जनतेने नाकारलं नाही. तुम्ही बेईमानीने सरकार बनवलं. आताचं तयार झालेलं सरकार हे बेईमानीने बनलेलं आहे, असा घणाघाती हल्ला फडणवीसांनी केला.

रावते, शिंदे, देसाईंना मुख्यमंत्रिपदी का बसवलं नाही?

पुत्र कर्तव्यपोटी राजकारणात आल्याचं उद्धव ठाकरेंनी कालच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात सांगितलं. ठाकरेंच्या याच वक्तव्यावर फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला. आतातरी उद्धवजींनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. आता त्यांनी मान्य करायला हवं, की मुख्यमंत्रिपदाची महत्त्वकांक्षी होती. राजकारणात महत्त्वकांक्षा असतेच, असणं वाईटही नाही. मग जर बाळासाहेबांना दिलेला शब्दच पाळायला होता, तर मग शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवता आलं असतं.. दिवाकर रावते होते, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई होते. तुम्ही यांना मुख्यमंत्रिपदी का नाही बसवलं?, असा रोकडा सवाल करत याचं उत्तर इतिहासात असल्याचं फडणवीस म्हणाले. इतिहासात आपण डोकावलं तर लक्षात येतं, यांना मग मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, तर मग राणेंना पक्षातून का जावं लागलं, त्यांना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं? राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं?, असे एक ना अनेक सवाल फडणवीसांनी उपस्थित केले.

महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही

मुख्यमंत्री कालच्या मेळाव्यात म्हणाले की, आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, पण म्हणजे नेमकं काय करायचंय, बंगालमध्ये युनियनबाजीमुळे आणि खंडणीमुळे एकही उद्योग टिकलेला नाही. जो कोलकाता देशाची आर्थिक राजधानी होता, त्याची अवस्था काय आहे?, जो तुमच्या विरोधात बोलेल, त्याचे हात पाय छाटून, त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकवायचं आहे का?, भाजप स्पष्टपणे सांगू इच्छितो जोपर्यंत आमच्या रक्ताचा एक एक थेंब आहे, आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, महाराष्ट्र महाराष्ट्रच राहिल.. आम्ही तुमचे मनसुबे उधळून लावू, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना ललकारलं.

संविधान बदलण्याचे मनसुबे बोलून दाखवले

उद्धव ठाकरेंनी कालच्या भाषणात संविधान बदलण्याचे मनसुबे बोलून दाखवले, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला. “काहीही झालं तरी आंबेडकरांचं संविधान कुणी बदलू शकणार नाही. बदललं जाणार नाही. काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन, काही डाव्या विचारांच्या काही पक्षांना सोबत घेऊन हा काही मनसुबा तुम्ही रचताय, तुमचा मनसुबा आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही”, असं फडणवीस म्हणाले.

हे इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार

“ज्या महाराष्ट्र सरकारचं नेतृत्व तुम्ही करताय, ते इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार तुम्ही लक्षात ठेवा, इतिसाहात याची नक्की नोंद होईल. तुमचा एकच अजेंडा, फक्त खंडणी… खंडणी!”, असा घणाघाती हल्ला फडणवीसांनी केला.

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार भाजपने पाडून दाखवावंच, या उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे म्हणतात की, सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे घडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसंच सरकार पाडण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्हाला जनतेच्या प्रश्नात इंटरेस्ट आहे, असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी सारखा ‘सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा’ चा धोशा का लावला आहे. मीच तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही एकदा सरकार चालून तर दाखवा, कामं करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन तर दाखवा, असे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरे भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवतात. पण त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे. अनेकदा शिवसेनेकडे उमेदवार नव्हता तेव्हा भाजपने त्यांना उमेदवार दिल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.

केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाविकासआघाडीतील नेत्यांना भाजपकडून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात टीका केली होती. भाजपने हिंमत असेल तर समोर येऊन मर्दासारखं लढावं, असे उद्धव यांनी म्हटले होते. या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करण्याला पंतप्रधान मोदींचा विरोध आहे. ते या सगळ्यात कधी लक्षही घालत नाहीत. भाजप हा लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे. काँग्रेस सरकारच्या काळात सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला तसा भाजप करणार नाही. मात्र, पंतप्रधान मोदी भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय गप्पही बसणार नाहीत. त्यामुळे ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भीती बाळगावी, ज्यांनी नसेल केला त्यांनी निश्चिंत राहावे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Ashish Shelar | भाजपवर काहीही बोला, पण संघ पद्धतीवर नख लावण्याचं काम केलं तर खपवून घेणार नाही