नवी दिल्ली ब्यूरो : उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमधील वैभव अग्रवाल यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर किराणा दुकानाच्या व्यवसायातून मोठी भरारी घेतली आहे. आपल्या वडिलांच्या किराणा दुकानामध्ये बदल करत त्यांनी आपल्या स्टार्टअपची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचे वडील संजय अग्रवाल यांच्या किराणा दुकानांमध्ये त्यांना नफा मिळत नव्हता. यामध्ये वैभवने आपल्या वडिलांना या व्यवसायात बदल करण्यास मदत केली आणि त्यांचा व्यवसाय वाढवला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी केवळ आपल्या वडिलांना व्यवसाय वाढीस मदत केली नसून आतापर्यंत 100 दुकानदारांना यामध्ये मदत केली आहे. द किराना स्टोर कंपनी; या आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांने हे काम केलं असून मागील 2 वर्षात त्याने 5 कोटी रुपयांची कमाई देखील केली आहे.
सहारनपूरमध्ये कमला स्टोअर नावाचं त्यांच्या वडिलांचं दुकान होतं. 2013 मध्ये इंजीनिअरिंगच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वडिलांच्या दुकानात काहीकाळ काम केलं. त्यानंतर मैसूरमधे एका मल्टी नॅशनल कंपनीमध्ये त्यांना नोकरी मिळाली. यादरम्यान त्यांनी मैसूरमध्ये विविध दुकानाचं निरीक्षण केलं. यावेळी त्यांना इथली दुकानं स्मार्ट असल्याचं लक्षात आलं. त्यांनी यामध्ये विविध निरीक्षणं नोंदवत येथील वस्तुंची विक्री आणि चेन सिस्टीम वेगळी असल्याचं दिसून आलं. यामुळं त्यांनी आपल्या वडिलांच्या दुकानात बदल करण्याचं निश्चित केलं. यासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला.
मल्टिनॅशनल कंपनी सोडली, केली 10 हजाराची नोकरी
मैसूरमध्ये काम करत असताना विविध दुकानाचं निरीक्षण केल्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेतला. 2014 मध्ये त्यांनी कंपनीतील नोकरी सोडत एका रिटेल कंपनीमध्ये 10 हजार रुपये पगाराची नोकरी पकडली. याठिकाणी त्यांनी रिटेल मार्केटमध्ये कशा पद्धतीनं काम चालत याचा अभ्यास केला. याठिकाणी कशा पद्धतीनं वस्तू तयार आणि वितरित केल्या जातात याचा अभ्यास केला. यामध्ये त्यांना प्रत्येक 1 किलोमीटरवर प्रोडक्ट आणि पॅकिंग बदलत असल्याचं दिसून आलं. यामुळं त्यांनी आपल्या व्यवसायाची आयडिया तयार करण्यास सुरुवात केली.
रिटेल स्टोअरचा केला अभ्यास
या रिटेल कंपनीमध्ये काम करत असताना त्यांनी आपलं हे ज्ञान वाढवण्यासाठी एमबीए करण्याचा निर्णय घेतला. ग्रोसरी रिटेल मार्केट आणि असंघटित क्षेत्रातील बारकावे याठिकाणी त्यांच्या लक्षात आले. यानंतर 2017 मध्ये त्यांनी दिल्लीतील एका एफएमसीजी कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांना दिल्लीबरोबरच पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधील रिटेल मार्केटविषयी माहिती मिळाली. वस्तुंचे वितरण आणि विक्रीचा अभ्यास करून त्यांनी रिपोर्ट तयार केला. यामुळं हे समजण्यास त्यांना मोठी मदत झाली.
वडिलांच्या दुकानाचं रूप पालटलं
दिल्लीमधील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी वडिलांच्या दुकानामध्ये बदल केला. दुकानामध्ये वस्तू ठेवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून अनेक गोष्टींमध्ये बदल केला. वस्तूंची विक्री आणि मॅनेजमेंटमध्ये त्यांनी बदल केले.ज्या वस्तूंची विक्री सर्वात कमी आहे अशा वस्तू विक्रीसाठी ठेवणं बंद केलं. याचबरोबर ग्राहकांचं लक्ष जाईल अशा वस्तू दुकानात ठेवण्यास त्यांनी प्राधान्य दिलं. यामुळं त्यांच्या नफ्यामध्ये फरक जाणवला. त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत देखील वाढ झाली आणि नफ्यात वाढ झाल्यानं भांडवल देखील वाढलं.
छोट्या शहरांमध्ये 100 दुकानाचं रूप बदललं
वडिलांच्या दुकानाचं रूप पालटल्यानंतर त्यांच्याविषयी माहिती पसरू लागली. त्यांनी बदल केलेलं दुकान पाहिल्यानंतर एका व्यक्तीनं त्याचं दुकान देखील असंच बनवण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळं वैभव यांनी आपला स्टार्टअप व्यवसाय सुरु केला. यामध्ये त्यांनी आतापर्यंत 100 दुकानाचं रूप बदललं असून अनेक छोट्या शहरांमधील दुकानांना वैभव यांनी नवीन रूप दिलं आहे. जवळपास 12 शहरांमधील 100 दुकानं त्यांनी या पद्धतीने तयार केली असून आपल्या स्टार्टअपचा देखील विस्तार केला आहे.
नवीन दुकान उभं करण्यास देखील करतात मदत
केवळ दुकानांमध्ये बदलच नाही तर नवीन दुकान उभं करण्यास देखील ते मदत करतात. अनेक दुकानांमध्ये सॉफ्टवेअर आणि अनॅलिटीक्ससाठी ते 1 हजार रुपये प्रतिमहिना चार्ज आकारतात. यामध्ये दर 15 दिवसांनी दुकानदारांना त्यांच्या अनॅलिटिक्स अहवाल सादर करतात. यामुळं व्यवसायात काय बदल करणं गरजेचं आहे हे दुकानदारांच्या लक्षात येतं. यामुळे व्यवसायवाढीस देखील मदत होते.