अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ही आग लागली असून रुग्णांच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. या विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते.
या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचाराधीन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर- राजेश टोपे
ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत असून या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत.
फडणवीसांकडून घटनेच्या चौकशी करण्याची मागणी
जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे.या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, अशी मागणी फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे.
@AnilDeshmukhNCP । 19 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, 9 दिवसांची ईडी कोठडीची मागणी फेटाळली