इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकथन अतिशय प्रभावीपणे करणारे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते.
मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या घरी सकाळी आठ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी बारा नंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी तोल जाऊन घरात पडल्याने बाबासाहेबांना दुखापत झाली होती. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना वीस दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाल्याने प्रकृतीची गुंतागुंत वाढली होती.
रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा 29 जुलै 2021 रोजी 100 वा वाढदिवस झाला होता . त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.
‘हे शब्दांच्या पलीकडचे दु:ख’ : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबतच फोटो शेअर केला आहे. ‘हे शब्दांच्या पलिकडचे दु:ख आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृतीच्या जगात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडल्या जातील. त्यांचे इतर कार्यही कायम स्मरणीय राहील’, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
“असा अलौकिक शिवआराधक होणे नाही..” : मुख्यमंत्री
पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोकही व्यक्त केला आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला. घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवराय चरणी लीन होतील.
शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत किर्तीची कवने लिहीण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहचवण्यासाठी दंग होतील. पुरंदरेवाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनामुळे अंतर्धान पावला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील. शिवचरित्राच्या अखंड पारायणालाच आयुष्य मानणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो अशी जगदंबा चरणी प्रार्थना. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.