नागपूर ब्युरो : दिव्यांग हा सामाजातील दूर्लक्षित घटक असल्यामुळे नागरिकांनी त्याच्या सर्वागिण विकासाकरीता मदतीचा हात देणे, अत्यंत गरजेचे आहे. दिव्यांगांना व्यंग असले तरी त्यांच्या अंगी असलेल्या प्रतिभाशाली व्यक्तीत्वामुळे ते अनेक बाबतीत इतरांच्या पुढे आहेत. त्यांच्या सुप्तगुणांना चालना देण्यासाठी चर्चा सत्र व कार्यशाळेच्या माध्यमातून प्रचलित व्यवस्थेत सामावून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करुन दिव्यांगांना आवश्यक त्या सर्व सुविधा जिल्हा प्रशासनातर्फे उपलबध करुन त्यांच्या समस्या व उपचाराबाबत मार्ग काढू, अशी ग्वाही प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिली.
शहरातील शंकरनगर येथील मुक व बधीर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुभेजकर, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, आशिष बोथरा, डॉ. जया शिवरकर आदी यावेळी उपस्थित होते.
दिव्यांग हेलन किलर मुक, बधीर व अंध असून सुध्दा जगात दैदित्यमान प्रगती केली आहे. त्यांची प्रेरणा घेऊन दिव्यांगाने सर्व क्षेत्रात प्रगती करावी, असेही त्यांनी सांगितले. दिव्यांगात फार प्रतिभा आहे, त्यास चालना देवून मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. या मानांकित संस्थेचा व स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव याच वर्षी आहे. त्यानुषंगाने दिव्यांगाचे विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी यावेळी दिली
दिव्यांगासाठी समर्पितपणे कार्य करण्याची आवश्यकता सामाजाची असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुभेजकर म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे. गंभीर समस्येवर शहरातील नेल्सन व मेयो हॉस्पिटल येथेही त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. जि.प.द्वारे जिल्हयात अपंगत्व प्रमाणपत्रासाठी शिबीराचे आयोजन करण्यात येत आहेत. आतापर्यंत 1 हजार 600 प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दिव्यांग व त्यांच्या पालकांच्या कल्याणासाठी घरकुल योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून आयएएस अधिकारी प्रांजल पाटील या दिव्यांग अधिकाऱ्यांपासून दिव्यांगांनी प्रेरणा घेऊन शिक्षण क्षेणात आपले नाव कमवावे, असे सांगितले.
प्रास्ताविकात प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी जागतिक दिव्यांग दिनाची पार्श्वभूमी विषद करतांना दिव्यांगाच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी 1994 साली युनोने जागतिक दिव्यांग दिनाचे आयोजन दरवर्षी 2 डिसेंबर रोजी करण्याचे ठरविले, असे त्यांनी सांगितले. दिव्यांगासाठी दहावीनंतरच्या शिक्षणासाठी शहरात निवासी शाळा सुरु करण्याची मागणी केली.
दिव्यांग व्यक्तीमध्ये कला गुणांची कमी नाही परंतु त्यांच्या वस्तुंना बाजारपेठ नाही. त्यामुळे कला गुण असूनही त्यांना मोठया अडचणींना सामना करावा लागतो. त्यासाठी जागा उपलबध करुन देण्याची मागणी केली. खेळातही दिव्यांगांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकीक मिळविले आहे. जिद्द व चिकाटीच्या आधारावर दिव्यांग जीवनात नक्कीच यशस्वी होतील. त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, पथनाटय आयोजन करण्यात आले. याद्वारे कर्णबधीरांच्या समस्या व उपचार यावर प्रकाश टाकण्यात आला. या शाळेतील शिक्षक श्याम पाटील, सामाजिक कार्यकर्ती अर्चना राठोड व इतर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.सांगोळे यांनी केले. या कार्यक्रमास दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.