ओमायक्रॉनपासून बचावासाठी काेराेना प्रतिबंधक लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावे. दुसऱ्या डोससाठी पात्र असणाऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत लसीकरण करुन घ्यावे, अन्यथा ५०० रुपये दंड ठाेठावण्यात येईल, असे आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काढले आहेत.
जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक साेमवारी झाली. तीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी १५ डिसेंबरपर्यंत लस न घेणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले. या बैठकीत चव्हाण म्हणाले, मंगल कार्यालयात समारंभाच्या वेळी नागरिकांचे लसीकरण करावे. दुकानमालक, कामगारांचे दोन्ही डोस पूर्ण करून तसा फलक दुकानाबाहेर लावावा. जे दुकानदार लसीकरण करणार नाहीत त्यांची दुकाने सील करावीत. कोरोनाच्या कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे म्हणाले, ‘ग्रामीण भागात दुसरा डोस न घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. नियंत्रण कक्षाद्वारे संपर्क साधून त्यांना डोस घेण्यासाठी प्रवृत्त करावे.’
अजून २ लाख लाेकांचे लसीकरण बाकी
– औरंगाबाद शहरात १० लाख ५५ हजार ६०० लाेकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ८ लाख ४४ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे, तर २ लाख ११ हजार नागरिकांनी एकही डाेस घेतलेला नाही.
– पहिला डोस घेतला पण तीन महिने उलटूनही दुसरा डाेस न घेतलेल्यांची संख्या ६७ हजार आहे.
– लसीकरण न झालेल्या लाेकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेतील ५० टक्के रक्कम पाेलिसांना तर ५० टक्के मनपाच्या फंडात जमा हाेणार आहे.