नवी दिल्ली ब्युरो : कोरोनाच्या संकटामुळे देशाच्या अडचणी वाढल्या. पण आज भारत सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये आघाडीवर आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं. तसेच कोरोनाचा तिसरा डोस देण्यात येत आहे. तरुणांच्या लसीकरणावर भर देण्यात आला आहे. सरकारने भविष्यातील प्लानही तयार केला आहे. त्यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आले असून त्यासाठी 64 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 8 हजाराहून अधिक औषधांच्या दुकानात स्वस्त दरात औषधे मिळत असून त्याचा देशवासियांना फायदा होत आहे, असंही राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितलं. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी केलेल्या अभिभाषणात सरकारच्या कार्याचा आढावा घेतानाच सरकारच्या भविष्यातील प्लानिंगवरही प्रकाश टाकला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणाच्या सुरुवातीलाच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या सैनिकांना आणि महानीय व्यक्तिंना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. केंद्र सरकारने कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची पावले उचलली. एका वर्षात 150 कोटी व्हॅक्सिनचा डोस देण्याचा विक्रम केला. देशातील 90 टक्के ज्येष्ठांना एक डोस मिळालेला आहे. तर 70 टक्के लोकांना दोन डोस मिळाले आहेत, असं राष्ट्रपतींनी सांगितलं. जल मोहीमही यशस्वी ठरत असून ग्रामीण भागातील जनतेला त्याचा फायदा झाला आहे, असं राष्ट्रपतींनी सांगितलं.
आपला स्टार्ट अफ इको सिस्टिम अत्यंत चांगला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळेच आपण आपल्या देशात सर्वात स्वस्तात स्मार्ट फोन देत आहोत. ज्या देशात इंटरनेट आणि स्मार्ट फोन स्वस्त आहेत, अशा देशांच्या यादीत आपण आहोत. हा सरकारच्या धोरणांचा परिपाक आहे. या धोरणाचा देशातील तरुण पिढीला मोठा फायदा होत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच भारत हा देशातील सर्वाधिक फोन निर्माण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरत आहेत. त्यामुळे देशातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही मिळत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी राष्ट्रपतींनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक विधानाचा दाखला दिला आहे. स्वाधिता आणि बंधुभावावर आधारीत आदर्श समाज मला अपेक्षित आहे, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. बाबासाहेबांचं हे विधान माझं सरकार ध्येय वाक्य मानत आहे. तुम्ही जर पद्म पुरस्काराची यादी पाहिली तर त्यातून ते स्पष्टपणे दिसून येत आहे, असं त्यांनी सांगितलं.