Home हिंदी देशभरातील आयसीयू मध्ये केवळ 32409 वेंटिलेटर बेड्स

देशभरातील आयसीयू मध्ये केवळ 32409 वेंटिलेटर बेड्स

740

खा. कृपाल तुमाने यांनी कोविड नियंत्रणासाठी संसदेत विचारले प्रश्न

नागपूर/ नवी दिल्ली : देशात दररोज 90 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण बाधित होत असून मृत्यूचा आकडाही दोन हजाराच्या वर आहे. कोरोनावर उपचारासाठी असलेले बेड्सची संख्या कमी आहे. देशात केवळ 32409 वेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. ही संख्या अपर्याप्त असून कोरोना बाधितांच्या मृत्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आयसीयु मधील वेंटिलेटर बेड्सची संख्या वाढवणे गरजेचे आहे, अशी मागणी खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत केली.

खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत देशात कोरोना रुग्ण संख्या, उपचार, व सरकार कडून केल्या जाणाऱ्या उपाय योजने बाबत प्रश्न उपस्थित केला. देशात कोरोना बाधित व्यक्तीवर उपचारासाठी 15 हजार 360 कोविड उपचार केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यात विना ऑक्सिजनचे साधे 13 लाख 20 हजार 881 आयसोलेटेड बेड्स आहेत. याशिवाय 2 लाख 32 हजार 516 ऑक्सिजन बेड्स असून आयसीयुमध्ये उपलब्ध असलेल्या 63 हजार 194 बेड्स पैकी केवळ 32409 बेड्स सोबत वेंटिलेटर जोडलेले आहे. वेंटिलेटर बेड्सची संख्या खूपच कमी आहे. यामुळे क्रिटीकल कोरोना रुग्णांना उपचार मिळणे कठीण होत असून मृत्यूची संख्या वाढत आहे. सरकारने जास्तीत जास्त वेंटिलेटर निर्मितीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वेंटिलेटरची संख्या सरकारी रुग्णालयात वाढविल्यास यामुळे कायम स्वरूपी उपचार यंत्रणा विकसित होईल, भविष्यात याचा फायदा देशातील आरोग्य व्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल, असेही खा. कृपाल तुमाने म्हणाले.

कोविड उपचारासाठी लस निर्मितीसाठी केंद्र सरकारने 8 उद्योगातील संशोधन संस्था व 2 शैक्षणिक संस्थांना 78.4306 कोटीचा निधी दिला आहे. प्रभावी लस निर्मितीसाठी हा निधी वाढविण्याची गरज असल्याचेही खा.कृपाल तुमाने म्हणाले. आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी तुमाने यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली व त्यावर योग्य विचार करून सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.

केंद्राकडून महाराष्ट्राला 1 हजार 611 कोटी

कोविड महामारीवर नियंत्रणासाठी वित्त मंत्रालयाने राज्य आपदा प्रतिक्रिया कोषातून (SDRF) सर्व राज्यांना 11 हजार 565.93 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्यातून महाराष्ट्राला 1 हजार 611 कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय राज्याच्या जीडीपीच्या 2 टक्के अतिरिक्त कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. यामुळे महाराष्ट्राला 15 हजार 394 कोटी रुपयाचे कर्ज घेण्याची मान्यता देण्यात आली असून ही सर्व राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांना महाराष्ट्रापाठोपाठ 9 हजार कोटीचे कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. सर्व राज्यांना कोविड नियंत्रणासाठी 1 लाख 6 हजार 830 कोटीचे कर्ज घेता येणार असल्याची माहिती कृपाल तुमाने यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नावर अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.