बलराम डोडानीसह पाच जणांविरोधात तक्रार
चंद्रपूर ब्यूरो : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शीख आणि शेतकरी समुदायाविरोधात व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकुर टाकल्याची घटना समोर आली. त्यानंतर चंद्रपुरातील शीख समुदाय आक्रमक झाला आहे. ‘ उजाला ग्रुप ‘ नामक व्हॉटसअप ग्रुपच्या अॅडमिनसह पाच जणांविरोधात पोलिसात तक्रार केली. या ग्रुपमध्ये जिल्ह्यातील भाजपच्या बड़े नेत्यांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत शीख समुदायातील लोक रामनगर पोलिस ठाण्यात आरोपींच्या अटकेसाठी ठाण मांडून बसले होते.
केंद्राने तीन नवे कृषी विधेयक मागे घ्यावे यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही. मात्र, विरोधकांकडून आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपुरातही शीख आणि शेतकरी समूदाय विरोधात ‘ उजाला ‘ नामक व्हॉट्सअप ग्रुपवर मागील काही दिवसांपासून आक्षेपार्ह मजुकर टाकला जात होता. याग्रुपचे अॅडमिन भाजपचे माजी नगरसेवक बलराम डोडानी आहेत. याच ग्रुपवर अरविंद सोनी, हरिकिशन मल्लन ( पप्पू मल्लन ), बजरसिंग आणि प्रदीप नामक व्यक्तीने शीख आणि शेतकरी समुदायांविषयी आक्षेपार्ह मजकुर टाकला.
खलिस्तानच्या निर्मितीसाठी शीख आणि शेतकरी समुदाय दिल्लीत आले आहे. याशिवाय शीख समुदाय पाकिस्तानाला मदत करीत आहे, असा आरोपही या ग्रुपमधील उपरोक्त लोकांनी केला. शीख समुदायाला देशद्रोही, पाकिस्तानी संबोधण्यापर्यंत या लोकांची मजल गेली. हा मजकुर शीख समुदायाच्या हाती पडल्यानंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
चंद्रपूर शहरातील सहा गुरुद्वाराच्या प्रमुखांनी एकत्र बैठक घेतली. यात श्रीगुरूद्वार गुरुनानक दरबार, तुकुम, श्रीगुरूद्वार गुरुसिंग सभा चंद्रपूर, गुरुद्वारा गुरूतेग बहादूर साहब कोसरा, गुरुद्वारा गुरनानक देव संतसभा बाबुपेठ, गुरुद्वारा बाबा दिपसिंग म्हाडा कॉलनी चंद्रपूर, श्री. गुरुद्वारा जोहरी समाज चंद्रपूर यांचा समावेश आहे. यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी सात वाजता रामनगर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असे ठाणेदार प्रकाश हाके यांनी सांगितले. मात्र आरोपींच्या अटकेसाठी शीख समुदाय बराच वेळ ठाण्यात ठाण मांडून होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून असे आक्षेपार्ह मजकुर समाजमाध्यमांवर टाकले जात आहे, असा आरोप उपस्थित गुरूजितसिंग गडोख, राणा पाल सिंग, हरविंदरसिंग धुन्ना यांनी केला. यावेळी मोठ्या संख्येत शीख बांधव उपस्थित होते. विशेष म्हणजे ‘ उजाला ‘ या व्हाट्सअप ग्रुपवर भाजपशी संबंधित लोकांचा समावेश आहे. या ग्रुपवर मागील काही दिवसांपासून शेतकरी आणि शीख समाजाविषयी अत्यंत खालच्या पातळीचा मजुकर टाकला जात होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु होती.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).