Home हिंदी Nagpur | पटोलेंनी शहरातील सर्व विकासकामाची खुशाल चौकशी करावी : आ.कृष्णा खोपडे

Nagpur | पटोलेंनी शहरातील सर्व विकासकामाची खुशाल चौकशी करावी : आ.कृष्णा खोपडे

719

नागपूर ब्यूरो : नागपूर शहरात महानगर पालिका निवडणुकीसाठी एक वर्ष उरले असताना कॉंग्रेसच्या नेत्यांचे शहरात सूडबुद्धीचे राजकारण सुरु झाले आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले संवैधानिक पदावर असताना त्यांना असले राजकारण शोभा देत नाही. सरकारला एक वर्ष होऊन गेला तरी सुद्धा संजय गांधी निराधार समितीचे गठन झाले नाही, त्यामुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळणे कठीण झाले आहे. या एक वर्षाच्या कारकिर्दीत एकही रुपया या शहराच्या विकासासाठी दिला नाही. उलट मंजूर झालेली कामे बंद करण्यात यांना स्वारस वाटले. पूर्व नागपुरातील भांडेवाडी डंपिंग यार्ड समोरील रस्ता याचे उदाहरण आहे. आता नागरिक मा.उच्च न्यायालयात गेल्यावर उच्च न्यायालयाने तात्काळ काम सुरु करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे ही सरकार काम करणारी नसून काम रोखणारी आहे हे स्पष्ट लक्षात येते.

विकासाचे राजकारण करावे

विधानसभा अध्यक्षांनी नागपूर शहरात चौकशीचे राजकारणासोबतच विकासाचे राजकारण देखील करावे. नागपूर शहराचे पालकमंत्री यांनी ग्रामीण भागात किती शेतक-यांना दिलासा दिला, याची चौकशी करावी. उर्जामंत्री शहरात असूनही वीज बिलात सवलत का देण्यात आली नाही, याची चौकशी करावी. कोरोन काळात वीज ग्राहकांना अव्वा चे सव्वा बिले आली, याची चौकशी करावी. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हयातील कोरोनामुळे मृत झालेल्या किती पोलीस कर्मचा-यांना मदत केली, याची चौकशी करावी. नवीन सरकार येताच शहरातील विकासकामांना गति आली किंवा नाही, याची चौकशी करावी. राज्य सरकारने एक वर्षात शहराच्या विकासासाठी किती दिवे लावले? याची चौकशी करावी. पटोले यांच्या निर्वाचन क्षेत्रातील शेतक-यांची काय स्थिती आहे, याची चौकशी करावी.

सिम्बायोसिसमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय

विधानसभा अध्यक्षांनी सिम्बायोसिसला दिलेल्या जागेबद्दल देखील चौकशीचे वक्तव्य दिले असताना आमदार कृष्णा खोपडे म्हणाले की, सिम्बायोसिस हे देशातील नव्हे तर जगातील नावाजलेले विद्यापीठ आहे. अशा उच्चस्तरीय विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी नागपुरातील विद्यार्थ्यांना मिळत आहे. सिम्बायोसिसच्या बाजूलाच 100 एकर पेक्षा जास्त जागेवर स्पोर्ट्स अथारिती ऑफ इंडिया (SAAI) सारखे विख्यात क्रिडा संकुल स्थापन होत आहे. शहरात मोठ-मोठी विकासकामे होत असताना कॉंग्रेस नेत्याच्या पोटामध्ये आता दुखू लागले आहे. त्यामुळेच सुडबुद्धीचे राजकारण या नेत्यांनी सुरु केले आहे. कॉंग्रेस नेत्यांनी स्वत:ची महाविद्यालये काढली तेव्हा यांना चौकशी सुचली नाही. या कॉंग्रेस नेत्यानी कशाप्रकारे शाळा-कॉलेज उघडण्यासाठी शासकीय जमिनी बळकावल्या. आता काही भूखंडमाफिया सिम्बायोसिसला दिलेल्या जागेबद्दल चौकशी मागतात. त्यामुळे भूखंडमाफिया नेमके कोण? आणि या भूखंडमाफियांनी आजपर्यंत केलेल्या जमिनीच्या सर्व व्यवहाराची देखील चौकशी पटोले यांनी करावी. अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).